जोगेश्वरी पश्चिमेकडील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन लवकरच होणार

विस्तारीत जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता, जोगेश्वरी (पश्चिम) बाजुकडील झोपडपट्टी धारकांचे पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत पुनर्वसन करणार – जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचे आश्वासन

जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता, जोगेश्वरी पश्चिम बाजुकडील गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. एकूण तीन विकासक या रस्त्याच्या आराखड्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. येथील पात्र झोपडपट्टी धारकांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येईल. परंतु ५६ झोपडपट्टी धारकांच्या पात्रतेबाबत समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजने अंतर्गत करण्यात यावे अशी मागणी खासदार गजानन कीर्तिकर यांनी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचेकडे केली. त्यांनी त्वरीत ती मागणी मान्य केली. याबाबत मा. जिल्हाधिकारी यांचे दालनात उच्च अधिका-यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळीस नगरसेविका सौ. राजुल पटेल, मनपा उपायुक्त श्री.किरण आचरेकर, सहाय्यक आयुक्त श्री. गायकवाड, उपजिल्हाधिकारी श्री. कोळेकर व स्थानिक सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तसेच मुंबई मध्ये १४ मच्छिमार वसाहती महानगरपालिकेने घोषित केल्या असून १५ वसाहतींच्या जनगणनेचे काम आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग यांचेमार्फत प्रगतीपथावर आहे. सदर जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मच्छिमार बांधवांच्या नावाने सात-बारा उतारा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.